नातं नाळेचं ....

भावंडात माझा नंबर तिसरा...मोठा भाऊ आणि बहीण आणि मग मी..माझा झोक तात्यांकडे व मोठ्या बहिणीकडे...आईशी भांडणं व्हायची, फारसं पटत नसे..

मला बिस्कीट, चपाती वगैरे खायला आवडायचं आणि भात, आमटी नको होती..जेवणा वरून आई नेहमी बोलायची... शिवाय माझा मन घर कामात लागत नव्हतं..मला आपणहून काम दिसत नसे, सुचत नसे.. या उलट बहीण ती घरातील आणि बाहेरील सगळी कामं करत असे...अगदी लहानपणात ती स्वयंपाक करायला देखील शिकली...
मी मात्र सांगितलेलं काम कसंबसं करायचे आणि कुळागारात पळ काढायचे ...एक मुलगी म्हणून माझं हे वागणं तिला काधिच पसंत पडलं नाही. 
माझ्या वेळी आई गरोदर असताना तात्या बांधत असलेलं मातीचं घर पडलं... आम्हाला मामाच्या घरी राहावं लागलं आणि माझा जन्मही तिथेच झाला. घर पडलं हि घटना आईला खुपच हादरवून गेली.. तरी त्यातून मार्ग काढत आई तात्यांनी दुसरं घर बांधलं...
माझ्या जन्माच्या आधी असं झालं, असं लोकं नातेवाईक  म्हणत... त्यातून पत्रिकेत मला मंगळ ग्रह आला..आईच्या मनातही खोलवर कुठेतरी ही शंका आणि माझ्या भविष्याची चिंता घर करून होती.
लग्न करून आलेल्या बाईला तिच्या पोटी तिच्या नवऱ्याच्या वंशासाठी मुलगा जन्माला यावा ही इच्छा असते, नाहीतर सासर कडल्या लोकांची बोलणी, टोमणे तिच्या नशिबी येतात..माझा मोठा भाउ लहानपणी खूप आजारी असायचा. त्याला श्वेतपेशींची उणीव होती.. पाय पण सुजायचे.. कित्येकदा शाळेत गेल्यानंतर येताना त्याला उचलून घरी आणावा लागायचा... अश्या परिस्थितीत बहिणी नंतरच्या गरोदर पणात मुलगा व्हावा अशी एक अपेक्षा आईच्या मनात होती...
तुटपुंज्या कमाईत संसाराचा गाडा चालवताना आई तात्यांची भांडणं व्हायची.. या सगळ्याला त्रासलेली आई अनेकदा आमच्या शेतात काम करायला येणाऱ्या लोकांना "कशी करणार मी दोन दोन मुलींची लग्न ?? मोठी तरी गुणी आहे पण ही?  असं बोलून दाखवायची...आणि तीचं काळजी कारणं अनाठायी नव्हतं.. कारण बहीण खुप सालस, कामसू, गुणी म्हणून प्रसिद्ध होती तर मी भांडकुदळ ...अनेक प्रश्न विचारणारी..सांगितलेलं ऐकून घेणं माझ्या स्वभावात नव्हतं...माझं कसं होणार?

3-4 वर्षांची असतानापासून हे संवाद, बोलणी मला आठवतात..आई मला बरी करत नाही.. तिला मोठी बहीण आवडते, मोठा भाऊ आजारी म्हणून त्याच्या कडे लक्ष असायचं ..आणि मलाच असं का वागवतात असा प्रश्न मला पडायचा...आईचा खूप राग यायचा? त्यात धाकटा भावाच्या जन्मा नंतर आईचा वेळ घर काम आणि भावाचं करण्यात जायचा...मी मोठ्या बहिणीशी आणि तात्या शी close होत गेले आई बरोबर तसं सूत कधी जमलं नाही..
कधी नातेवाईक किंवा शाळेत कुणी विचारायचे आई आवडते कि तात्या...??  मी क्षणाचाही विलंब न करता 'तात्या' असं उत्तर देत असे...पुढे शाळेत, कॉलेजात, आणि माझ्या कामाच्या जागीही माझं हे तात्या प्रेम खूप फेमस झालं होतं...

आई खुप काम करायची घर, कुळागर दोन्ही बाजू सांभाळायची... जेवण करण्यात तिचा हात खंडा होता.. गोवन चण्याचो रोस, श्रीखंड, तुरीच्या डाळीचे सार, सुक्या मिरच्यांची चटणी, लोणचे, पानगा, असेल त्या सामानात ती अगदी चविष्ट जेवण करी..
आमच्या कडून अनेक स्त्रोत्र, कविता, परवचा म्हणून घेई, पावकी, दिडकी, औटकी ही तिला पाठ होती.. तिला शिकायची खूप इच्छा असूनही शिकायला मिळालं नव्हतं..त्या मुळे आम्हाला अभ्यासाला आई धारेवर धरायची...तिला अनेक गाणी तोंड पाठ असत..खुप छान गाणी म्हणे.."प्रेम स्वरूप आई ..वात्सल्य सिंधु आई." .हे गाणं ऐकताना तर रडू च येई...
सगळं काम आवरून ती दुपारचं वर्तमान पत्र घेऊन बसे.. सगळ्या बातम्या, आणि राजकारणातील घडामोडी वगेरे वाचल्याशिवाय तिला जेवण जात नसे.. कुठल्या राज्याचे मुख्यमंत्री, उप मुख्य मंत्री कोण आहेत, कुठे निवडणुका आहेत सगळं रुची घेऊन वाचत असे.. सामान्य ज्ञानाच्या विषयात एखादा असा प्रश्न आला कि मी तिला विचारायचे...
वाढत्या वया बरोबर आई मुलीत एक मैत्रीचं नातं निर्माण होतं...शाळा कॉलेज च्या मैत्रिणींच्या गोष्टी सांगण्याची ती जागा बनते...हे मी माझ्या मैत्रिणींच्या बाबतीत बघत होते... पण माझ्या बाबतीत हि जागा माझी बहीण होती आई नव्हे....
समज  आल्यावर आईच्या बाबतीत लं माझं हे वागण्या विषयी मलाच आश्चर्य वाटायचं पण त्यात सुधारणा होईल असं काही घडलं नाही ..कॉलेज मध्ये असताना मी थोडं  वेगळं काम करायला सुरुवात केली होती.दुसर्यांचे प्रोब्लेम ऐकायचे व त्यांना मोकळं व्हायला जागा द्यायची, थोडं गाईड करायचं वगैरे मी करत असे.. व्यसन असलेल्या, किंवा वाईट संगत असलेल्या  अनेक मुलांशी परिचय होता,  मैत्री होती त्यांना त्यातून बाहेर काढणं हे जवाबदारी म्हणून स्वीकारलं होतं...आई तात्यांना ते आवडायचं नाही... खरं तर मी मुलगी म्हणून त्यांना भीती च वाटायची... "आमच्या कडे पैसे नाहीत, आहे ती इज्जत, ती तुम्ही जपा" असं आई सांगायची... आई वडील म्हणून काळजी पोटी होणारं त्यांचं बोलणं आता समजलं तरी त्या वेळी ते पायात बेड्या टाकल्या सारखं वाटायचं...
मी मुलगी म्हणून मला काहीच फ्रीडम नाही? असं का? मी का स्पष्टीकरण देत बसू कि मी कुठे गेली ते?असा अविश्वास मुलीच्या बाबतीतच का दाखवला जातो?एक ने अनेक प्रश्न मला नेहमी सतावूनसोडत... आई का नाही माझी बाजू घेत? हि माझी तिच्या बाबतीतली तक्रार...घरातील साध्या साध्या गोष्टींनी पण आईचं ढळतं माप भावांच्या बाजूने च असायचं....

2001 मध्ये गोवा सोडला... सामाजिक क्षेत्रात लं काहीच माहित नव्हतं आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करायचं होतं.. खूप मन लावून दिवस रात्र मेहनत करायचो...गावा गावांनी फिरायचो.. लोकांना भेटणं, तिथं काम करणं, बरे वाईट अनुभव, अपमान, दोष, सगळं सहन करत टिकून राहायला शिकलो...
हे करत असताना मला अतिशय बिकट परिस्थितीतील लोकांचं जीवन जवळून पहाता आलं आणि मला आई च्या वागण्या मागची कारणं उमगली...
मग मी कधी कधी घरी यायचे... आई तेव्हा नातवंडांत रमून गेलेली.. मी आले कि माझं सगळं करायची, जीव ओतून करायची, पण माझी भूमिका हळू हळू काळजी घेणाऱ्या साईडला येऊ लागली होती.. तात्यांचे आरोग्याचे प्रोब्लेम सुरु झाले होते... त्यामुळे अपेक्षा आपोआप कमी होत गेल्या... आणि जे प्रेम काही घरून मिळत होतं ते बोनस वाटायला लागलं...
मानसिक आरोग्य बिघडण्याची पहिली ओळख होते माणसाच्या वागणुकीवरून... खूप राग राग करणं, त्रागा करणं याला आपण स्वभाव चा भाग गृहीत धरतो... तो फक्त  स्वभावाचा भाग नसून मानसिक स्वास्थ्य ठीक नसण्याची लक्षणं असतात... मन सतत excite, अशांत राहण्याची लक्षणं असतात आणि वेळेवर उपचार झाले तर हे प्रोब्लेम बऱ्याच अंशी ठीक होऊ शकतात...
आई ने जीवनात सहन केलेले उतार चढाव, तात्यांच्या स्वभाव, माहेरची माया न मिळणं, सासरी ही अपेक्षा भंग, गरिबीत तात्यांच्या संघर्षात तिची साथ सतत राहिली पण अपेक्षा भंग, याआणि कोंडमारा या मुळे मानसिक संतुलन ढासळलं... ते शेवट पर्यंत कधी ठीक होऊ च शकलं नाही... त्या नंतर आम्हा भावंडांची भूमिका तिची  आई व्हायची होती ...पण ते किती कठीण असतं ते आम्हाला समजलं....
मी तिला माझ्या बरोबर एक दोनदा अहमदाबादला नेली... गावातल्या कामात ती कधी कधी थोडीशी रमायची...पण परत गाडी मूळ पदावर यायची...
एकेकाळी चांगलं जेवण करण्यात फेमस, लोकांना मदत करणारी, अडी अडचणीला धावून जाणारी, मेहनत हाच जीवन मंत्र मानणारी आई आता परावलंबी होत होती.. तीच्या वागण्या मुळे, मानसिक अवस्थे मुळे  कित्येकदा मी तिच्यावर रागवायचे .
मागच्या दोन वर्षात ती जास्त थकली... आता अहमदाबादला जाऊ शकणार नाही हे तिला कळत होतं..  मी (शाणू) कधी येणार हे विचारीत राहायची
या वेळेला 25 एप्रिल घरी आले. मी खुप दिवस राहणार म्हणून खुश होती... खूप गोष्टीही केल्या...27 तारखेला घाणा भरताना म्हणण्याच्या ओव्या ही तिने म्हणून दाखवल्या. भावाच्या मुलाच्या मुंजीत आईला दोन्ही दिवस आणली, ती थकलेली वाटत होती...2 मे ला मोठ्या भावा बरोबर घरी जाताना तू ये असं म्हणत होती , मी दोन दिवसांनी येते म्हणून तिला समजावलं 3 ला दुपार पासून सणकुन ताप भरला..रात्री हॉस्पिटल मध्ये आणली, पण .4 मे ला पहाटे आईने exit घेतली जीवन रीतं,होऊन गेलं ..तिचं ते परत परत एकच वाक्य बोलणं "शाणू माझे पाय चालत नाय" कानात परत परत घुमत राहतं ... आई असताना तीची मला किंमत नव्हती, तिच्याशी मैत्री नव्हती... आज ती नाही तेव्हा तेव्हा ती माझ्या साठी काय होती हे कळतंय...
जन्मा नंतर नाळ कापून मुलाला वेगळं करतात..पण ही नाळ कधी कापलीच जात नाही ...आई-मुलाचं हे नाळेचं नातं सगळ्या मतभेदांच्या पलीकडलं असतं....काळा वेळाच्या बंधनातुन मुक्त असतं....

दिल