माणुसकी पेरणारी माणसं ...

 आदिवासी क्षेत्रातील "सागटाळा" हे डोंगराच्या कुशीत विसावलेलं 3 वाडयांचं गाव. 

गावाच्या चहू बाजूनी जंगल .आणि हो ...एका वाड्या वरून दुसऱ्या वाड्या वर जायचं तरी जंगलातूनच जावं लागेल..

जंगलातच लोकांची शेती...पिढ्यान पिढ्या कसत असले तरी कागदोपत्राच्या कचाट्यात सापडल्या मुळे लोकांच्या नावावर नसलेली पावसाळी शेती....

शेतात पिकलेले दाणे 6-8 महिने पुरतात आणि नंतर व्होराच्या दुकानातून विकत किंवा उधार...

इकडे गावात व्होरा समाजातील लोकांची दुकानं 

धर्माने मुस्लिम पण व्यापारी वर्ग असल्यामुळे त्यांची इतर धर्मातल्या लोकांशी फार जवळीक ...

गावातील व्होराचं दुकान हे 12 महिने बेधडक शेतातल्या दाण्या पासून, मधापर्यंत, महुडयाच्या फुलांपासून कच्च्या कैऱ्या, चिंचा, डिंक...सगळं विकण्याची आणि खरीदण्याची हमखास जागा...!! 

गावात मीटिंग करत असताना मुलं जमतातच.. काही तर फारच लहानगी आई च्या मांडीवर बसूनच असतात...

मीटिंग चालू होण्यापूर्वी मुलां साठी काहीबाही खाऊ नेण्याची आमची रोजची  सवय.... त्या निमित्ताने काही सकस आहार पोटात जातो... आणि मीटिंग पण 2 तास आरामात करता येते...

एखादा गंभीर प्रश्न चर्चेला असेल तर आमच्यातील एखाद्याने मुलांना बघण्याची भूमीका घ्यायची ..हे ही ठरलेलं...

त्या दिवशी जाताना काही घेऊन जाता आलं नाही ..म्हणून गावातील एकुलत्या एक व्होरा च्या दुकानात शिरले  

गावातील या छोटेखानी दुकानात हमखास मिळणारी वस्तू म्हणजे गूळ, चणे, शेंगदाणे ...मी त्याला ते द्यायला सांगितले तेवढ्यात एक लहानसा मुलगा 5 रुपये घेऊन "बा ए मसालो आलवानु कह्यु स" असं बोलून उभा राहिला..

आसिफभाई (दुकानदार) नी छोट्या पुड्या करून मिरची पावडर, धणे, जिरे, हळद आणि थोडंसं तेलही बांधून दिलं...मुलगा निघून गेला... मी पहातच राहिले ..

आपला देश... लाखो रुपयांची बेग, करोड रुपयांचा ड्रेस घालणाऱ्या लोकांचा ही आणि 5 रुपयात भाजी, आमटीचं सामान नेणाऱ्या आदिवासींचा ही....

मला खिन्न पाहून आसिफभाई म्हणाले," बेन पैसा नथी... पण मोल न करी शकाय ऐवी माणसाईथी भरेला छे आ लोको" 1 रूपियो लई ने आवे तोय सामान आलु हूं.(बेन, गरीब असतील पण माणुसकीच्या खजिन्याची धनी आहेत ही लोकं..5 नव्हे 1 रुपया घेऊन आली ना तरीही देतो मी सामान त्यांना)

आणि मग आसिफ भाईनी संपूर्ण कहाणी सांगितली ...

2002 च्या दंग्या वेळेची कहाणी ...आसिफभाई आणि त्यांचे वडील दुकानी होते ..गोधरा आणि त्या नंतर चाललेली दंगल गावात पोचेल असा अंदाज नव्हता... वातावरण तणावग्रस्त असलं तरी गावातील दुकानं उघडत होती... अचानक त्या दिवशी सकाळी 11:30 सुमारास गावात अचानक एक जीप आली.. तलवारी घेऊन उभे राहिलेले युवक.. गावात येऊन त्यांनी युवकांना भडकवायला सुरुवात केली

काढा त्यांना घरा बाहेर ...गावा बाहेर...वेशी बाहेर आणि आमच्या ताब्यात द्या...

आसिफभाई आणि त्यांचे वडील दुकान तसंच टाकून पळाले... गावाच्या सीमेवरील जंगलात, शेतात... कुठे जाऊ आणि काय करू असं त्यांना झालं होतं...

तेवढ्यात दुसऱ्या वाड्यावरील आणि गावातील मुसलमान लोकं धावत आली... कुठेतरी शेतात लपली...

थोड्या वेळानं टोळी आली.. कुठे गेले.. बाहेर काढा... मारा च्या घोषणा... लावा आग शेताला.. कुणीतरी बोललं आणि शेतात भराभर पेटलेले करंडे यायला लागले... भडाभडा शेतं जळू लागली...

आसिफभाई शेताच्या दुसऱ्या टोकाकडून बाहेर पडून सुकलेल्या  नदीच्या पात्रात उतरले.... पाण्याच्या झोता मुळे निर्माण झालेली एका कपारीत त्यांनी आश्रय घेतला.... तिथून ते कुणाला दिसत नव्हते....

दुपार टळून रात्र होत आली होती... टोळी तील युवक कधीच निघून गेले होते.."अब्बू कुठे असतील? पहिल्यांदाच भानावर येऊन त्याने स्वतः लाच प्रश्न विचारला... आणि लगेच तोंडावर गच्च हात दाबून तो बसला... तोंड उघडलं तर .????

नदीच्या काठी लपत लपत चालत राहिल्या नंतर आसिफभाई ना अश्याच एका दगडा मागे अब्बू भेटले...

रात्री कुणाचा तरी आवाज आला आणि आसिफभाई सावध झाले...लपलेल्या जागेतून त्यांनी पहिलं तर गावातील आदिवासी बायका डोक्यावर पाणी घेऊन त्यांनाच शोधत होत्या...बायकांनी शीळ वाजवली 

आसिफभाईनी परत शीळ वाजवून प्रत्युत्तर दिलं... 

बायका जवळ आल्या आणि त्यांनी भराभर भाकरी, चटणी आणि पाणी दिलं... बाकी लोकं कुठं आहेत त्याची विचारपूस केली.... "सगळं ठीक झाल्या शिवाय इथून हलू नका..". त्यांनी सांगितलं

हळू हळू लक्षात आलं कि शेतात, आजूबाजूला जवळ जवळ 80 माणसं लपलेली आहेत...

दुसऱ्या दिवशी पाणी, भाकरी घेऊन जास्त बायका आल्या....त्यांनी कपडे ही आणले होते ...आदिवासी बायकांचे आणि पुरुष मंडळीचे कपडे......प्रत्येकीने मुस्लिम महिलेला, मुलीला आदिवासी घागरा,चोळी, गळ्यातील डोरलं, अगदि हुबेहूब आदिवासी बनवून टाकलं... पुरुष,मुलगे ही आदिवासी वेष घालून तैयार झाले .." हे दाढीचं सामान" दाढी काढा... बाहेर वातावरण भडकलं आहे..राक्षस झालेत सगळे " आदिवासी बायांनी आपल्या बरोबर  या लोकांना लपवत घरी नेलं... आणि पुढचे कित्येक दिवस घरात लपवून ठेवलं...

थोडी माणसं ...बायका, मुलं जळालेल्या शेतात भस्म झाली होती .."आमच्यात जमिनीत मूठ माती दिल्या शिवाय जन्नत मिळत नाही... असिफ भाई चे अब्बू रडत रडत म्हणाले "तमे चिंता नो करता..अमे करसु" या लोकांनी त्यांच्या शेतात मेलेल्या लोकांना मूठ माती दिली...

सगळं शांत झाल्यावर जवळच्या बारीया शहरात रिलीफ केम्प मध्ये मुस्लिम बांधवाना सुखरूप सोडलं...

नंतर आम्ही त्यांना धान्य, पैसे देऊ केले..." अमाराथी नो लेवाय" (आम्ही घेऊ शकत नाही) 

आज या गावातील कोणीही बारीया आला तर तो आमच्या घरी "मेहमान" असतो... जन्म जन्मीचे उपकार आहेत त्यांचे...हे ऋण आम्ही कधी फेडू शकणार नाही...

लाख, करोड नव्हे तर पैशांनी तुलनाच करता येणार नाही असा माणुसकीचा अनमोल ठेवा या लोकांपाशी आहे..म्हणून बेन....मी इथे व्यापार करत नाही... करू शकत नाही...

आता मला समजलं .. त्या मुलाला फुकट देऊन लाजवायचं नव्हतं म्हणून 5 रुपये....

माणसाने माणसाशी माणसासम वागणे 

या वाक्यावर चर्चा करण्यासाठी मोठमोठाले सेमिनार होतात... कार्यशाळा होतात...

सागटाळा सारख्या गावातील आदिवासी माणुसकीच्या धर्मा पुढे बाकीचं सगळं खुजं आहे हे स्वतः जगून शिकवतात...चार पुस्तकं शिकून स्वतः ला शहाणी समजणारी मी.....मी  याना काय शिकवणार होते?

वाटलं ....मला पंख यावेत आणि मी सागटाळा गावातील प्रत्येकाला भेटावं... त्यांना माझ्या पंखावर बसवून माणुसकीचं बीज पेरायला शहर, नाका, गल्ली, बोळ सगळीकडे घेऊन जावं....!!.

No comments:

Post a Comment

दिल